नायगाव / भगवान शेवाळे
लोकनेते तथा माजी खासदार कै. वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त नायगाव (बा.) येथे भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता समाधी पूजन त्या नंतर १० ते १२ या वेळेत वसंत स्मृती कृषी महाविद्यालयाच्या लालवंडी रोड नायगाव बा. परिसरात हा सोहळा होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार युवाकीर्तीवीर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे हरिनामाचे कीर्तन यावेळी होणार असून, त्यांच्या ओघवत्या वाणीतून अध्यात्मासोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून लोकनेते कै. वसंतराव चव्हाण यांच्या सेवाभावी कार्याला व जनसेवेला अभिवादन करण्यात येणार आहे.
कै. वसंतराव चव्हाण यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. साधेपणा, माणुसकी, जनसामान्यांशी असलेली आपुलकी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कार्यपद्धती यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचक्रोशीतील गायक, वादक, भजनी मंडळे तसेच जिल्हाभरातून येणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन खा. रविंद्र वसंतराव चव्हाण,व चव्हाण परिवार तसेच समस्त गावकरी मंडळी, नायगाव (बा.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान या बैठकीस केशव पाटील चव्हाण, माधव आप्पा बेळगे, वसंत सावकार मेडेवार,प्राचार्य रमेश लव्हेकर ,सुरेश पा. कल्याण, हणमंत पा. चव्हाण, आनंदराव पा. चव्हाण, श्रीनिवास पा. चव्हाण, सुधाकर पा. शिंदे यांच्यासह मान्यवर व्यापारी, पत्रकार, नगरसेवक, तसेच वसंत चव्हाण मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भक्ती, हरिनाम, प्रबोधन आणि महाप्रसादाचा हा सोहळा कै. वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेणारा प्रेरणादायी उपक्रम असून या विषयावर एक चित्रफित यावेळी दाखवण्यात येणार आहे.अशी माहिती संचलन करते बालाजी शिंदे यांनी दिली.आभार मित्र मंडळाचे सचिव संजय आपा बेळगे यांनी मानले.
