बरबडा तसेच पाटोदा,अंतरगाव,इज्जतगाव,मनूर गावाला दिलासा देणारा आणि अवघ्या दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला रस्ता सध्या मात्र देखभालीच्या नावाखालीच धोक्यात येण्याच्या शक्यतेत आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी काढण्याचे काम मंगळवारी करण्यात आले; मात्र हे काम करताना रस्त्याची कड सुरक्षित ठेवण्याची साधी काळजीही घेण्यात आली नसल्याचे चित्र समोर आले आहे.
झाडी काढताना रस्त्याच्या कडेला असलेले डांबर, खडी व मुरूम मोठ्या प्रमाणात उखडून रस्त्यावरच पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे झाडी हटविण्याच्या कामासाठी करण्यात आलेली साफसफाई आता रस्त्याच्या नुकसानीचे कारण ठरली आहे.विशेष म्हणजे, अवघ्या दोन वर्षांपूर्वी नागरिकांना चांगल्या रस्त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र देखभालीच्या कामातच अशा प्रकारचा निष्काळजीपणा होत असेल तर रस्त्याचे आयुष्य किती दिवस टिकणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
झुडुपाची साफसफाई करायची होती की रस्त्याची कड उखडायची होती? असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. झाडी काढताना यंत्रसामग्रीचा वापर झाला असल्यास त्यामध्ये रस्त्याचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का? तसेच हे काम कोणाच्या देखरेखीखाली करण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रस्ता तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्यानंतर त्याची देखभाल आणि संरक्षण करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असते. मात्र रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी काढताना रस्त्याचेच नुकसान होत असेल, तर अशा कामाच्या गुणवत्तेवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.त्यामुळे साफसफाईच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
